मुसळधार पावसामुळे चासमधील जनजीवन विस्कळीत   

चास-घोडेगाव रस्त्यावरील पुलाचा भराव गेला वाहून

मंचर, (प्रतिनिधी) : चास ता. आंबेगाव येथे सलग तीन ते चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील कामे ठप्प झाली आहेत. ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याने चास-घोडेगाव रस्त्यावरील पुलाचा भरावा वाहून  गेल्याने वाहतूक विस्कळीत झाले आहे. पूल वाहून जाण्याची दुसर्‍यांदा घटना घडली आहे.   
 
चास येथे वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे वीज वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक हैरान आहेत. चास पंचक्रोशीतील शेतीचे बांध वाहून गेले आहेत. पिकेही जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. चास ते घोडेगाव रस्त्यावर चिंचोली आणि चास गावाच्या शिवेवर मोरी टाकून पूल तयार केला होता. परंतु ओढ्याला आलेल्या पुरात पुलाचा भरावा दुसर्‍यांदा वाहून गेला आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
 
पानमळावस्तीकडे जाण्यासाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या ३७ लाख रुपये निधीतून पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी टाकण्यात आलेला भरावा मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. कोथींबीर, मेथी, फ्लावर, टोमेटो, कोबी, शेपू आदी पिकांत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे पिके सडू लागली आहेत. नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles